गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नदया दुथडी भरुन वाहत आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कृष्णा, कोयना, तारळी, उमोडी या नदयांनाही पूर आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा या नदयासुध्दा दुथडी भरुन वाहत आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून सर्व विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत. पुणे महसूल विभागात आज अखेरीस १२० टक्के पाऊस झाला आहे.
पुणे विभागातील जिल्हा निहाय झालेला पाऊस :
पुणे – १५३ टक्के
सोलापूर – ७८ टक्के
सातारा – १५० टक्के
सांगली – १८८ टक्के
कोल्हापूर – ९५ टक्के
साताऱ्यात ५६ नागरि्कांना सुरक्षित स्थळी हलवले
सातारा जिल्हयामध्ये १६ कुटुंबांतील ५६ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यामधील कृष्णा आणि कोयना नद्यांना पूर आला असून या दोन्ही नदीच्या काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोयना धरणातून ६० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा-लोणंद, जुना सातारा-पुणे, तारगाव-नांदगाव रोड, पाटण-मुळगाव, कराड-तांबवे आदी रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सांगलीत ४२५ लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले
कृष्णा आणि कोयना नदीला आलेल्या पुरामुळे सांगली आणि मीरज शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सांगली महापालिका हद्दीत ८५ कुटुंबातील ४२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्ग बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील ३५७ कुटुंबातील १७२८ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुतर्फा वाहत असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी दोन वेळा ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या एका टिमची मागणी करण्याचे आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. सध्या कोल्हापूर-मिरज हा रेल्वे मार्ग बंद असलयाचे त्यांनी सांगितले.
सोलापूरात पाऊस कमी
सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान कमी आहे. पुणे जिल्हयातील जवळ जवळ सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे उजनी धरणाचा पाणी साठा ५० टक्क्यांपर्यंत पर्यंत गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यालगत राहणाऱ्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.