काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा इम्तियाज जलील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबाबात मोठा गौप्यस्फोट केला. त्याच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
”२०१९ मध्ये झालेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मला खासदार करण्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा होता”, असा गौप्यस्फोट एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसंच, ”पक्ष वेगवेगळे असले तरी खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत असलेली माझी मैत्री घट्ट आहे”, असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.
वैजापूरचे माजी उपनगराध्यक्ष शेख अकील शेख गफूर यांच्या गोल्डन उद्योग समूहाच्या खंडाळा येथील नवीन पाइप कंपनीचा शुभारंभ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. त्या कार्यक्रमात राज्यमंत्री सत्तार व खासदार इम्तियाज जलील या दोन राजकीय नेत्यांची राजकीय जुगलबंदी रंगली.
अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक जीवनलाल संचेती होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ.रमेश बोरनारे, भाऊसाहेब ठोंबरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, उपनगराध्यक्ष साबेर खान, दीपक राजपूत आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात भाष्य करताना ”अब्दुल सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर झाले आहेत. राजकारणात एखाद्यावर त्यांची कृपादृष्टी झाल्यास त्याचे नशीब बदलून जाते. मात्र एखाद्यावर सत्तार नाराज झाल्यास त्याचा वाईट काळ सुरू होते, मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी खूप मोठी मदत केली. त्यामुळं मी खासदार होण्यात सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे”, असंही जलील यांनी म्हंटल.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून इम्तियाज जलील निवडून आले होते. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं निवडणूक सोबत लढली होती. इम्तियाज जलील यांनी तत्कालीन खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. त्यावेळेस अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते.
हेही वाचा – महागाईविरोधात ३१ मार्चपासून काँग्रेसचा राज्यव्यापी ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह – नाना पटोले