घरमहाराष्ट्रमी डगमगलेलो नाही, लढाई जिंकणारच

मी डगमगलेलो नाही, लढाई जिंकणारच

Subscribe

मी काँग्रेससोबत गेलो म्हणून टीका करतात, पण आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही शिवसेनेवर बंदी घातली नव्हती. शिवसैनिकांना त्रास झाला, पण बंदी आली नव्हती. आता तर यांनी बंदी घातली. मग हिंदुत्वाच्या विरोधात कोण गेले, असा सवाल ठाकरे यांनी केला.

मुंबई – तुमची बुद्धी गोठली नसेल तर बाळासाहेबांचे नाव वापरू नका, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे शिवसेना हे नाव अंतरिम निकाल देऊन गोठविले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक तोंडावर असतानाच हा निर्णय आल्याने ठाकरे गटासमोरील आव्हाने वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुकच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला.

उलट्या काळजाच्या ४० डोक्यांच्या रावणाने शिवसेनारूपी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे. ज्या धनुष्यबाणाची बाळासाहेब देव्हार्‍यात ठेवून पूजा करायचे, तो धनुष्यबाण यांनी गोठविला आहे. आता त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. त्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्या पाठीशी असणार्‍या महाशक्तीला झाला असेल, मात्र असे असले तरी मी डगमगलेलो नाही. तुम्हीही डगमगू नका. आपण ही लढाई जिंकणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला. मिंधे गटाचा वापर करून भाजप एक दिवस त्यांना फेकून देणार असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना हे नाव दिले. वडील बाळासाहेबांनी शिवसेना रूजवली. तीच मी आज तुमच्या साथीने पुढे घेऊन जात आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हा पक्ष काढला. हिंदुत्वाचा विचार आपण पुढे नेला. हातात काहीही नसताना माणसे येत गेली. अनेकांनी पक्षासाठी विविध त्याग केले आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह तर बाळासाहेब देव्हार्‍यात ठेवून पूजायचे, मात्र या ४० तोंडाच्या उलट्या काळजाच्या रावणाने शिवसेनारूपी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे, पण मी डगमगणार नाही. तुम्हीही डगमगू नका. आत्मविश्वासाने मी पुढे जाणार आहे. संकटे येतच असतात, पण संकटात नेहमी एक संधी दडलेली असते. ती संधी मी शोधणार आहे. त्या संधीचे मी सोने करेन. आपल्यासाठी दिवस आणि रात्रही वैर्‍याची आहे. आपल्याला जागे राहावे लागणार आहे. आत्मविश्वासाने ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे. ती जिंकल्यानंतर आपल्यासमोर आव्हान देणारे कोणीच नसेल, असा आशावादही ठाकरे यांनी व्यक्त केला.

काँग्रेसनेही शिवसेनेवर बंदी घातली नव्हती

- Advertisement -

my my

भाजप मिंधे गटाला वापरून फेकून देईल

यांना शिवसेना संपवायची आहे. भाजप मिंधे गटाचा त्यासाठीच वापर करीत आहे. त्यांना मात्र ते समजत नाही. आता चिन्ह गोठले, नावही वापरता येणार नाही. एका दृष्टीने भाजपचा हेतू सफल झाला आहे. मिंधे गटाचा उपयोग आता जवळपास संपत आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडून हे अपेक्षित नव्हते

निवडणूक आयोगाने जो अंतरिम निकाल दिला तो अपेक्षित नव्हता, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, मुळात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल केली आहे. सगळ्या घटनातज्ज्ञांचे मत आहे की निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. मग निवडणूक आयोगाने आता जो निकाल दिला त्याची जबाबदारी कोणावर येणार? पण आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निवडणूक आयोगावर कधीकाळी टी. एन. शेषन यांच्यासारख्या निष्पक्ष आणि निस्पृह अधिकार्‍यांनी काम केले आहे. आम्हाला तशाच कामाची अपेक्षा असल्याचेही ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -