राज्यातील सांगली कोल्हापूर आणि कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता हा पूर ओसरल्यानंतर संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांचा धोका आहे. स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो असे साथीच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. या आजारांचा धोका लक्षात घेता ‘राज्य सरकारने स्वतंत्र समिती‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने जारी केलेला अध्यादेश
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती गठीत’ केली जाणार आहे. याबाबत सरकारने अध्यादेश जारी केला आहे. जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री न राहता पालकमंत्र्यांनी नेमलेला प्रतिनिधी हे समितीचे अध्यक्ष राहतील, असे या अध्यादेशात सरकारने म्हटले आहे.
राज्यातील वाढती लोकसंख्या पाहता अचानक उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांमुळे अनेकदा आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतो. त्यामुळे, अनेकदा सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटलचे समन्वय साधण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे काम ही समिती करणार आहे.
हेही वाचा – पावसाळ्यासोबत आले साथीचे आजार