राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यापासून मागच्या सरकारचे काही निर्णय बदलण्यात आले. आता तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनांच लक्ष्य करण्यात आले आहे. जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्यात येणार असल्याचे संकेत आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिले. “जस्टिस लोया प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्याबाबत काही लोकांनी विनंती केली आहे. मी त्याबाबत त्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहेत. त्यानंतर माहिती घेऊन आम्ही पुन्हा चौकशी सुरु करण्याबाबत विचार करु”, असे उत्तर अनिल देशमुख यांनी यावेळी दिले.
काय आहे जस्टिस लोया प्रकरण?
गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी जस्टिल लोया करत होते. या प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांचे आरोपी म्हणून नाव होते. त्यामुळे हा खटला संवेदनशील झाला होता. लोया हे आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूर येथे आले असताना १ डिसेंबर २०१४ रोजी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र हा मृत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात होते.
सरकार स्थापन झाल्यानंतर एका पत्रकार परिषदेत शरद पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी सांगितले होते की, “जर कुणी तक्रार घेऊन आले आणि त्यात तथ्य आढळल्यास नक्कीच पुन्हा चौकशी सुरु केली जाईल. मात्र मुद्दामून चौकशी सुरु केली जाणार नाही.”, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली होती. जर तक्रारदारांच्या कागदपत्रांमध्ये तथ्य आढळल्यास चौकशी सुरु करण्याबाबत विचार करु असे आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील सांगितले आहे.