मुंबई : देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्राणपणाने व्यूहरचना आखण्यात मश्गूल असतानाच जम्मू-कश्मीरात मात्र पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनेने कश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे कट-कारस्थान रचल्याची भयंकर बातमी आहे. 1990च्या दशकात अतिरेक्यांनी जसे दहशतीचे वातावरण निर्माण करून हजारो पंडितांना कश्मीर सोडायला भाग पाडले, त्याच दिशेने पुन्हा कश्मीरची वाटचाल सुरू झाली असेल तर तो राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे, असे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केंद्रातील मोदी सरकारवर शरसंधान केले आहे.
केंद्रातील सत्तापक्ष गुजरातच्या प्रचारसभांत, निवडणुकीच्या जोड-तोडीपासून रोड शोपर्यंतचे सूक्ष्म नियोजन करण्यात गुंतला असतानाच तिकडे कश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या 57 कश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांची गोपनीय यादीच दहशतवाद्यांनी आपल्या वेबसाईटवर जाहीर केली आहे. एका अर्थाने ही माहिती फोडून अतिरेक्यांनी कश्मिरी पंडितांची हिटलिस्टच जाहीर केली आहे. कश्मीर खोरे तत्काळ सोडा; अन्यथा टार्गेट किलिंग करू, अशी खुलेआम धमकीच या अतिरेक्यांनी कश्मिरी पंडित-कर्मचाऱ्यांना दिली आहे. मुळात ही यादी अतिरेक्यांपर्यंत पोहोचलीच कशी? केंद्र सरकार व जम्मू-कश्मीर प्रशासनाला याचा जाब द्यावाच लागेल, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत कश्मिरी पंडितांना खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी विभागांत नेमणुका देण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांकडून कश्मिरी पंडितांची वेचून हत्या केली जात आहे. शिक्षक, बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या सातत्याने सुरू असलेल्या ‘टार्गेट किलिंग’मुळे कश्मिरी पंडितांमध्ये आधीच भय व दहशतीचे वातावरण आहे. त्यातच लष्कर-ए-तोयबासोबत काम करणाऱ्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या अतिरेकी संघटनेने काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या पंडित कर्मचाऱ्यांची यादीच जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
खोऱ्यामध्ये आमचा जीव सुरक्षित नाही, त्यामुळे आम्हाला खोऱ्यात नेमणुका नको, तर जम्मू विभागात बदल्या करा, या मागणीसाठी पंडित-कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या वर्षभरात 24 कश्मिरी पंडित आणि बिगर कश्मिरी नागरिकांची अतिरेक्यांनी हत्या केली आहे. त्यात आता ‘टीआरएफ’ या पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनेने कश्मिरी पंडित असलेल्या 57 कर्मचाऱ्यांची हिटलिस्ट जाहीर करावी, हे धक्कादायक असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
370 कलम रद्द केल्यानंतर कश्मीरात सारे काही आलबेल होईल, असा शब्द मोदी सरकारने दिला होता, त्याचे काय झाले? गुजरातच्या निवडणुका संपल्या आहेत. आता तरी केंद्रातील सत्तापक्ष ‘इलेक्शन फिव्हर’मधून बाहेर पडून कश्मिरी पंडित आणि देशावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी वेळ काढेल काय? असा सवालही ठाकरे गटाने केला आहे.