मुंबई : कोल्हापूर शहरातील काही तरुणांनी मंगळवारी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला औरंगजेब आणि टिपू सुलतानचे फोटो ठेवल्यावरून वादाची ठिणगी पडली. कोल्हापूर शहरात हिंसाचार (Kolhapur violence) उसळला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीवर (MVA) निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही लोक बिथरले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा – कोल्हापुरात 350 जणांवर गुन्हे दाखल, बंदची हाक देणाऱ्या संघटना राहिल्या बाजूला
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार येऊन या महिन्याच्या अखेरीस एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण गेल्या सहा महिन्यात राज्यातील जाती-धर्मातील तेढ वाढत चालली आहे. 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या वेळी औरंगाबाद, मुंबई, अकोला आदी शहरांत तणाव निर्माण होऊन दगडफेक आणि जाळोपळही झाली होती. आताही अहमदनगरमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये दंगल उसळली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. @PawarSpeaks हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल.…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 9, 2023
महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण करण्याच्या घटना या कनेक्शनची चौकशी करण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे गट आणि महाविकास आघाडीवर दोषारोप केले आहेत.
हेही वाचा – प्रत्येक दंगलीमागे राजकीय हात; संजय राऊतांनी कोणावर केला गंभीर आरोप?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तणाव निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.