पुणे : पुण्यातील वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला रामराम केला असून ते आता मित्र पक्षांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. अशातच आता वसंत मोरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नवे राजकीय समीकरण होताना दिसत आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रे चा नारा दिला आहे. (Maharashtra Politics Vasant More Prakash Ambedkar meeting a new political equation in the state)
हेही वाचा – Sanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही… निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट
वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज बैठक झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी शंभर टक्के पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आहे. मी माझं नशीब समजतो की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मला याठिकाणी बोलावलं. मला त्यांनी पुरेसा वेळ दिला आणि आमच्यात चांगली चर्चा झाली. पुण्यातील मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे, त्यामुळे आमच्याकडे खूप वेळ आहे. पुढील काही दिवसांत कोणता मार्ग स्वीकारायचा याबाबत निर्णय घेऊ. तसेच पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील, अशी माहितीही वसंत मोरे यांनी दिली.
हेही वाचा – Sharad Pawar : प्रफुल्ल पटेलांना घोटाळ्याप्रकरणी क्लीनचीट मिळाल्यावर शरद पवारांचा भाजपावर निशाणा
नवीन राजकीय समीकरण मांडणार
नुकतेच मविआतून बाहेर पडलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरेंच्या भेटीबाबत बोलताना सांगितले की, वसंत मोरे यांच्याबरोबर आज आमची चर्चा झाली. अधिकृत निर्णय 31 मार्चपर्यंत आम्ही जाहीर करू. तसेच महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल, ती कोण कोण करणार आहे. हे अधिकृतरित्या काही दिवसांतच सर्वांसमोर मांडू. काही चर्चा आताच जाहीर करू शकत नाही. परंतु मी नवीन राजकीय समीकरण मांडू इच्छित आहे, असे सूचक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.