मुंबई : एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बंद केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून महाविकास आघाडीने भाजपावर टीका केली आहे. आता पाप करणारे भाजपात जातात, असे काँग्रेसने म्हटले आहे.
हेही वाचा – Sharad Pawar : प्रफुल्ल पटेलांना घोटाळ्याप्रकरणी क्लीनचीट मिळाल्यावर शरद पवारांचा भाजपावर निशाणा
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (यूपीए) नागरी विमान वाहतूकमंत्री असलेले प्रफुल्ल पटेल आणि एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अनियमिततेचे आरोप होते. हे प्रकरण एअर इंडियाकडून मोठ्या संख्येने विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित आहे, ज्यामुळे राष्ट्रीय वाहकाचे मोठे नुकसान झाले आहे तर, खासगी व्यक्तींना आर्थिक लाभ झाला आहे असे आरोपपत्रात म्हटले आहे.
आपल्याकडे बोली भाषेत बोललं जायचं की जर पाप केलं तर लोक नरकात जातात. पण आता काळानुसार बदल झाला आहे, आता पाप करणारे लोक भाजपात जातात असं म्हणण्याची वेळ आली आहे. pic.twitter.com/b0f8o5n4jQ
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 29, 2024
यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापाठोपाठ काँग्रेसने भाजपावर जहरी टीका केली आहे. आपल्याकडे बोली भाषेत बोलले जाते की, ‘पाप केले तर लोक नरकात जातात’; पण आता काळानुसार बदल झाला आहे. आता पाप करणारे लोक भाजपात जातात असे म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
ठाकरे गट, एनसीपी-एसपीची टीका
प्रफुल्ल पटेल यांनी विमान घोटाळ्यात तब्बल 840 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे भाजपा आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने सांगितले गेले. पण आता प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाशी सलगी केल्यानंतर मात्र त्यांना ‘क्लीनचीट’ मिळाली आहे. अशा प्रकारे भाजपाने जनतेची फसवणूकच केली आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तर, तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपामध्ये गेलेले बरे, अशी एकच चर्चा सुरू असून ती खरी ठरताना दिसत आहे, अशी कोपरखळी एनसीपी-एसपीचे प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा – Thackeray group : भाजपाकडून जनतेची फसवणूक, प्रफुल्ल पटेलप्रकरणी ठाकरे गटाची टीका