गेल्या महिन्यापासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटन स्थळांवर गर्दी असते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुण्यातील भिमाशंकर येथेही सध्या भाविकांची गर्दी आहे. पण रविवारी सकाळी येथील कुंडात पडून गुरुदवाल अग्रहरी या भाविकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळी जाताना जरा जपून!
पाय घसरुन पडले कुंडात
उत्तरप्रदेशातून हेमराज अग्रहरी (४२) त्यांचे मित्र आणि भावासोबत पुण्यातील भिमाशंकर येथे आले होते. भिमाशंकर मंदिराजवळ आल्यानंतर मित्र आणि त्यांचा भाऊ कुंडात पाय धुण्यासाठी गेले. तर गुरुदवाल मंदिराच्या मागच्या बाजूच्या कठड्यावर उभे होते. अचानक कुंडाच्या दिशेने त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे त्यांना पाण्याबाहेर काढण्यास अडचणी आल्या. अखेर स्थानिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, ्अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
भिमाशंकर परिसरात पावसासोबत धुक्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. निसर्गाचा आनंद घेण्याच्या नादात भान विसरतात, त्यामुळे असे अपघात घडतात. त्यामुळे नागरिकांनी आनंद लुटताना वाहने सावकश चालवावी. शिवाय स्थानिकांचे ऐकावे-
–सुरेश कौदरे, अध्यक्ष, भिमाशंकर देवस्थान ट्रस्ट
पावसाळी पर्यटनाला जाताय?
पावसात वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी ट्रेकिंग आणि सहलीचे आयोजन केले जाते. पण अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
- एखाद्या स्थळाची पूर्ण माहिती नसेल तर अशा स्थळावर एकटे कुठेही जाणे टाळा
- विशेषत: पाणी असलेल्या ठिकाणी तळाचा अंदाज नसतो. तेव्हा अशावेळी पाण्यात उतरणे टाळा
- उंचावरील पॉईंटसवर सेल्फी घेणे टाळा, कारण ते जीवघेणे ठरु शकतात
- मद्यपान करुन कोठेही दंगा करुन नका
- पावसात नदीचे किनारे, कुंड अशा ठिकाणी शेवाळ साचते. त्यामुळे जागा निसरडी होते. यात तुमचा पाय घसरुन तोल जाऊ शकतो