राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्याचा आणि जिल्ह्याचा विकास ठप्प आहे. वादळातील नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे ठप्प आहेत. ठेकेदारांना पैसेच न मिळाल्याने रस्ते अपुर्ण आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे परत गेलेले विकासकामाचे ६५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात येऊन दिले होते. मात्र, तो शब्द त्यांनी पाळला नाही. पालकमंत्री उदय सामंत यांची तर मनमानी सुरुच आहे, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टिका केली.
जिल्हातील विकास कामांच्या याद्या मंजूर करताना विश्वासात घेतले जात नाहीत. या याद्यांवर केवळ पालकमंत्र्यांचीच सही आहे. जिल्हाधिकार्यांनी या याद्यांवर सही करण्यास टाळले आहे. पालकमंत्र्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे आपण आजच्या जिल्हा नियोजन समिती सभेवर बहिष्कार घातल्याचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा नियोजन समितीची सभा १० जानेवारी नंतर पाच महिन्यांनी 20 मे रोजी झाली. मात्र शासन निर्णयाच्या मार्गदर्शक सूचना डावलून पालकमंत्री उदय सामंत करत असलेल्या मनमानी कार्यपध्दतीवर आमदार नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नितेश राणे यांनी या सभेच्या प्रारंभीच पत्रकार परिषद घेतली. खोळंबलेली विकासकामे, तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना न मिळालेली नुकसान भरपाई, ठेकेदारांना पैसे न मिळाल्याने रखडलेल्या रस्त्यांची कामे, पशुपक्षी प्रदर्शनात झालेली उधळपट्टी अशा विषयांकडे नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले.
जिल्हा नियोजन समिती सभेत विकासावर चर्चा होणे अपेक्षीत होते. पण या सभेत अशी चर्चा होताना दिसत नाही. तब्बल पाच महिन्यांनी सभा घेताना या सभेची व कामांची कार्यपद्धती शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार होत नाही. विकास कामे मंजूर करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही. कामांच्या याद्या मंजूर करताना पालकमंत्र्यांची मनमानी आहे. त्यावर त्यांच्याच सह्या आहेत. जिल्हाधिकार्यांच्या सह्या या याद्यांवर नाहीत. त्यांनी त्या करायच्या टाळल्या आहेत. त्यामुळे प्रशासनातील अधिकार्यांनाही पालकमंत्र्यांचा हा मनमानी कारभार मान्य नाही असेही यातून उघड होते असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषदेवर सद्या प्रशासक असून पालकमंत्र्यांनी अधिकार्यावंवर दबाव टाकून घाईगडबडीने कृषी पशु पक्षी प्रदर्शन भरवले. शेतकर्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त न ठरता याकडे त्यांनी पाठ फिरवली. मे महिन्यात अखेरच्या क्षणी हे प्रदर्शन घेऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला.
– तेजस्वी काळसेकर, सिंधुदुर्ग