घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या विरोधात; ५० पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

पुण्यातील मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या विरोधात; ५० पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

Subscribe

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सात पदाधिकाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली होती. काँग्रेसचे कसबा पेठ पोटनिवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याने पक्षाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे. पण आता रवींद्र धंगेकरांचा प्रचार करण्यासाठी मनसेच्या ५० पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केला आहे.

सध्या पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभांच्या पोटनिवडणूकांची धूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला न जाण्याचे आदेश देखील राज ठाकरेंकडून देण्यात आले होते. त्यानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी न होता पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परंतु कसबा पेठ मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराला हजेरी लावल्याने मनसेकडून त्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेने सात पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या विरोधात गेल्याने हलालपट्टी केली आहे.

मनसेने सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता ५० पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पधिकाऱ्यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देण्याची स्पष्ट भूमिका घेतल्याने या मतदारसंघात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. ज्यामुळे आता राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर रवींद्र धंगेकर हे थेट मनसेच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी मनसेच्या कसबा पेठेतील स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी देखील धंगेकर यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी मनसे खरंच भाजपला पाठिंबा देणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. तर यानंतर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची पद्धत आहे असे म्हणत या प्रश्नाला पूर्णविराम लावला होता.

दरम्यान, मनसेच्या ५० पदाधिकाऱ्यांनी धंगेकरांसाठी पक्षाला रामराम ठोकल्याने याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत उर्फ तात्या मोरे हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते सुद्धा कधीही पक्षाला सोडचिट्ठी देऊ शकतात असे बोलले जात असतानाच ५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मनसेला हा सर्वात मोठा धक्का मिळाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; ठाण्यातील घटना

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार केल्याप्रकरणी मनसेने रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे आणि नीलेश निकम यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी पक्षातील पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -