ठाणेः नवीन इमारतीची पायाभरणी सुरु असताना ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगांराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ठाण्यात घडली. हबीब बाबू शेख(४२) आणि रणजित अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. तर निर्मल रामलाल राब (४९) हा कामगार या घटनेत जखमी झाला आहे. हे तिघेही मुंब्रा येथील आहेत.
नौपाडा येथे सांयकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली. बी- केबिन येथे सत्य नीलियम या नवीन इमारतीची पायाभरणी सुरु होती. त्यावेळी अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली हे तिन्ही कामगार अडकले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांचाच गोंधळ उडाला. पोलीस व आपत्ती विभागाला याची माहिती देण्यात आली. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, अतिक्रमण निष्कासन विभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती विभागाने तत्काळ अडकलेल्या कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन कामगारांना मृत घोषित केले. जखमी कामगारावर उपचार सुरु आहेत. या घटनेची पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे.
Maharashtra | Two workers died while one was injured after they were stuck in debris as soil caved in during the construction work in Thane district. Injured taken to hospital. Probe underway: Police (23.02) pic.twitter.com/OvB8RIJnBH
— ANI (@ANI) February 24, 2023
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या का?, ही घटना नेमकी कशी घडली?. कोणी जाणीवपूर्वक कामगारांना तेथे पाठवले होते का?, याचा तपास पोलिस करत आहेत. घटनास्थळी असलेल्या अन्य कामगारांचाही जबाब पोलीस नोंदवणार आहेत.
दोन कामगारांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यु झाल्याने अन्य कामगारांमध्ये घबराट पसरली आहे. परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी केली जात आहे. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी होत आहे.