घरमहाराष्ट्र"पत्रास कारण की," म्हणत मनसेने सुषमा अंधारेंवर केला पलटवार

“पत्रास कारण की,” म्हणत मनसेने सुषमा अंधारेंवर केला पलटवार

Subscribe

खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या श्री सदस्यांच्या मृत्यूवरून राजकारण करण्यात येत आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात आलेले आहे.

खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या श्री सदस्यांच्या मृत्यूवरून राजकारण करण्यात येत आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात आलेले आहे. राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणावरून भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पण त्यांच्या या टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर देत पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून देण्यात आले आहे. तर मनसेने सुषमा अंधारे यांच्या पत्राला पत्रानेच उत्तर देत त्यांच्यावर पलटवार केला आहे.

मनसेने सुषमा अंधारे यांना लिहिलेले पत्र…
माननीय सुषमाताई,
वास्तविक माननीय म्हणावे असे तुमच्यात काहीही नाही. वासरात लंगडी गाय शहाणी, या न्यायाने उद्धव सेनेच्या वासरांत तुम्ही आहात. बाकी परजीवी बांडगुळ आणि तुम्ही यांच्यात काहीही फरक नाही. तरीही शिष्टाचार म्हणून तुम्हाला माननीय म्हटले आहे. स्वतःस माननीय समजू नये. पत्रास कारण की, तुम्ही माननीय राजसाहेबांना लिहिलेले पत्र वाचले. आणि “नवा मुल्ला जोरात बांग देतो” या उक्तीची प्रचिती आली.
हिंदू धर्माबद्दल आणि देव देवतांबद्दल तुम्ही या आधी उधळलेली मुक्ताफळे आम्ही ऐकली आहेत. ते तुमचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य असेलही. पण आमच्या श्रद्धांचा तो अपमान होता. माननीय बाळासाहेबांच्या बाबतीतही तसेच. माकडं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत असतात, मागच्या झाडावर आपण काय खाल्ले आहे, हे माकडाच्या लक्षात नसते. आपण माकड नाही, माणूस आहोत, याचे भान राजकारणातल्या व्यक्तीला असले पाहिजे. तुमच्याकडे ते आहे असे काही वाटत नाही.
आज उद्धवजींच्या बाजूने तुम्ही बांगा मारत आहात, आणि मीच कशी उद्धवनिष्ठ हे दाखवण्याचा तुमचा आटापिटा सुरु आहे. त्यासाठी आज तुम्ही राज साहेबांवर टीका केलीत. आपल्यापेक्षा अधिक हुशार कुणीच नाही, असा गंड तुम्हाला झाला असावा. तो हे उत्तर वाचून कदाचित दूर होईल. त्यामुळे तुमच्या प्रत्येक मुद्द्याची चिरफाड करायला घेत आहे.

- Advertisement -

१) कोरोना ही महामारी उद्धवनिर्मित नाही हे आम्हालाही माहीत आहे. पण त्या महामारीत उद्धवनिर्मित कंत्राटदारांनी लोकांच्या जीवाशी आणि जनतेच्या पैशाशी खेळ केला हे तुम्हाला माहीत नसावे. त्याची माहिती आधी करून घ्या. सुजित पाटकर यांच्यावर काळ पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ते कोण आहेत याची माहिती घेतलीत तर बरे होईल.

२) हिंदू धर्म, हिंदू धर्मियांच्या श्रद्धा याबद्दल खालच्या भाषेत टीका करण्यात तुमची हयात गेली आहे. त्यामुळे “श्री परिवार”, त्यांचे सामाजिक काम याबद्दल तुमच्या डोक्यात अंधार असणार याची आम्हाला खात्री आहे. कोट्यवधी नागरिकांची ज्या व्यक्तीवर श्रद्धा आहे, त्या व्यक्तीला जाहीर कार्यक्रमात पुरस्कार देणे घटनाबाह्य आहे, असे संविधानात लिहिलेले नाही.

- Advertisement -

३) पुरस्कार मिळालेली कोणतीही व्यक्ती ही लोकप्रियच असते. अन्यथा तुम्हालाही एखादा पुरस्कार मिळाला असता. त्यामुळे माननीय आप्पासाहेबांना पुरस्कार देऊन त्यांची लोकप्रियता सरकारसाठी वापरण्याचा आपला आरोप सगळ्याच सरकारांवर करता येईल. अगदी शरद पवारांच्या सुद्धा.

४) पी एम केअर फंडाचे अंकेक्षण झाले आहे. आणि त्याचा अहवाल संसदेत ठेवण्यात आला आहे. आणि तुमच्या लाडक्या मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे पूर्ण खर्च झाले नाहीत, हा प्रकाश डोक्यात पाडून घ्या.

५) मंदिर आणि तुम्ही यांचा काहीही संबंध नाही. मंदिर या एका विषयावर फुलवाले, हारवाले, भिकारी, गायवाले, उदबत्तीवाले अशा हजारो लोकांची उपजीविका अवलंबून असते. तुमच्या लाडक्या उद्धवजींनी बार उघडले आणि मंदिरे बंद केली होती. त्यावेळी तुम्ही बहुतेक राष्ट्रवादीत होता.

आणि हो, आज जे संविधान आणि कायदा तुम्हाला दिवसरात्र आठवतो आहे ना, तो तुमच्या उद्धवजींनी धाब्यावर बसवला होता. संदीप देशपांडेंवर हल्ला झाल्यानंतर राज साहेब भेटायला गेले त्याबद्दल बोलाल तर आवडता मासा मेला म्हणून नेत्यांसह आमदार व खासदारांना भेट नाकारणाऱ्या नेत्या पेक्षा कार्यकर्त्याला हात जरी लावला तरी त्याच्या मागे खंबीरपणे उभे कसे राहायचे हे राज साहेबांनी दाखवून दिले म्हणून मिडिया ते वारंवार दाखवत होती पण हे तुमच्या लक्षात नाही येणार ते वेगळे. उद्या पक्ष बदललात कि याच मुद्यावर तुम्ही थयथयाट कराल याची आम्हाला खात्री आहे.
राहता राहिला तुमच्या उद्धवजींचे कौतुक. ते तर who चे सल्लागार होते. त्यांच्या काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. सर्वाधिक भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला. सर्वाधिक सरकारी मारहाणी महाराष्ट्रात झाल्या. उद्योजकांच्या घराखाली जिलेटीन महाराष्ट्रात ठेवले. जाऊदे. तुम्ही अडचणीत याल असे आणखी मुद्दे मांडत नाही. “दे राशन, करते भाषण” मधून वेळ मिळाला तर “रेन ड्रॉप्स पीआर” ही काय भानगड आहे, ते उद्धवजी आणि आदित्यजींना विचारून घ्या. कधीतरी उपयोगी पडेल.
एक राहिलेच. खारघरच्या जखमींना भेटायला राजसाहेब गेले होते की नाही ते तुमचे खासदार राजन विचारेंना विचारून घ्या. ते उत्तर देतील.
तुर्तास तुमच्यासाठी एवढं पत्र पुरेसं आहे.

मनोज चव्हाण.
मनसे सरचिटणीस

#Manojchavan
Raj Thackeray
MNS Adhikrut

ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये भावाचे नाते असले तरी, हे दोघेही एकमेकांच्याविरोधात राजकीय कुरघोड्या करताना दिसतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कायमच सोशल मिडीयावर शाब्दिक वॉर पाहायला मिळत असतो.


हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हे अचानक नव्हतं…’, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -