मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका बदलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या रडारवर आले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत खोचक टीका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा काल, मंगळवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. अपेक्षेप्रमाणे महायुतीत सहभागी होत असल्याचे राज ठाकरे यांनी या मेळाव्यात जाहीर केले. या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी या मेळ्याव्यात मांडली.
हेही वाचा – Raj Thackeray : कोणती तरी नस मोदी सरकारने दाबली असावी, वडेट्टीवार थेटच बोलले
यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने भाजपाच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. 2019मध्ये त्यांनी मोदी यांना लक्ष्य केले होते, पण या पाच वर्षांत असे नमके काय घडले की, त्यानी भूमिका बदलली. कदाचित त्यांची दुखती नस मोदी सरकारने दाबली असावी. काही ना काही तरी ‘दाल में काला है…’, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे.
प्रत्येक निवडणूकीत…
इधर चला मैं उधर चला जाने कहां मैं किधर चला?
या निवडणूकीत
अरे फिसल गया, भाजपा तुने क्या किया?ओळखा पाहू कोण ते?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 9, 2024
तर काँग्रेसचेच नेते सचिन सावंत यांनीही यासंदर्भात ट्वीट करत, ‘कोई… मिल गया’ चित्रपटातील गाण्याचा आधार घेऊन प्रत्यक्षात नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रत्येक निवडणुकीत इधर चला मैं उधर चला जाने कहां मैं किधर चला? तर, या निवडणुकीत अरे फिसल गया, भाजपा तूने क्या किया? असे असल्याचे सांगत सचिन सावंत यांनी प्रश्न केला आहे, ओळखा पाहू कोण ते?
हेही वाचा – Lok Sabha 2024: कोणती फाईल उघडली की मनसेचा नमो निर्माण पक्ष झाला; राऊतांचा खोचक सवाल