आता तरी १२ आमदारांची नियुक्ती करा

नाना पटोलेंची राज्यपालांना विनंती

Nana Patole allegation canceling the political reservation of OBCs is the fault of the Fadnavis government

भाजप जाणीवपूर्वक विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्याचे काम करत आहे. कुठलातरी मुद्दा उपस्थित करून न्यायालयात याचिका दाखल करायची आणि प्रक्रिया अडकवून ठेवायची. परंतु भाजपच्या या प्रवृत्तीला मुंबई हायकोर्टाने चपराक दिली आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयांना माझी विनंती आहे की, त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घेवून विधान परिषदेवरील 12 आमदारांची नियुक्ती करावी, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केली.

विधिमंडळ आवारात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणून ही निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करत असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळून मोठी चपराक दिली आहे. शिवाय त्यांचे १२ लाख रुपये देखील जप्त केले आहेत. भाजपने आता तरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचे आणि चांगले काम सुरू असताना त्याला कोर्टात आव्हान द्यायचे काम भाजपने बंद करावे. राज्यपाल महोदय यांना माझी विनंती आहे की त्यांनी आतातरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व १२ आमदारांच्या विषयावर लवकर निर्णय घ्यावा.

राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प ११ तारखेला सादर केला जाणार आहे. त्याआधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी, अशी आमची इच्छा आहे. अशोक चव्हाण, अनिल परब, अजित पवार यांनी राज्यपाल यांची मंगळवारी भेटही घेतली आहे. अर्थसंकल्पाच्या आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी आणि राज्यपाल त्यादृष्टीने निर्णय घेतील, असा आमचा विश्वास आहे, असे नाना पटोले म्हणाले.