मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेलं. दरम्यान, भाजप नेते प्रमोद जठार यांनी राणेंच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप ठाकरे सरकारचं थडगं उभारल्याशिवाय राहणार नाही, असं प्रमोद जठार म्हणाले.
प्रमोद जठार यांनी यात्रा आजच्यापुरती थांबवली आहे, असं स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्यांनी यात्रेचं परिवर्तन आता आंदोलनात झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत राणे साहेबांची सुटका होत नाही तोपर्यंत भाजप राज्यभरात आंदोलन करणार, असं जठार म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी संभाजी महाराजांना देखील याच संगमेश्वरा अटक झाली होती. औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात केलं होतं. त्यामुळे या सरकारचं थडगं महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष राहणार नाही, ठाकरे सरकारने दगाफटका केला आहे, अशी टीका जठार यांनी केली.
बलात्कारी मोकळे फिरतायत, १०० कोटी खंडणी घेणारे मोकळे फिरतायत, बलात्कार करणारे मंत्री मोकळे फिरतायत. जोपर्यंत राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत कोकण, महाराष्ट्र शांत होणार नाही…कोकण, महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रमोद जठार यांनी दिला.