नाशिक : दरवर्षी तुलसी विवाहानंतर खर्या अर्थाने तापमानात घट होऊन गारठा वाढू लागतो. परंतु, यंदा १५ दिवस आधीच नाशिकच्या तापमानात मोठी घट होऊन शहर व जिल्हा गारठला आहे. दोन आठवडे आधीच आलेल्या थंडीच्या लाटेमागे दोन चक्रवातांचे कारण असल्याचे समोर आले आहे. पश्चिम दिशेकडून हिमालयाकडे आलेल्या दोन चक्रवातांमुळे यंदा राज्यात पंधरा दिवस आधीच कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राज्यात मंगळवारी (दी.२) सर्वात कमी १२.५ तापमान औरंगाबादमध्ये तर नाशकात १२.६ नोंदवले गेले. आगामी दहा दिवस वातावरणात असाच गोठवणारा गारवा राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.
हिमालयात पश्चिमेकडून आलेले चक्रवात, उत्तरेकडून वाहणारे वारे, स्वच्छ, निरभ्र आकाशामुळे राज्यात किमान व कमाल तापमानात घट झाली. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांसाठी थंडीचा हंगाम लाभदायी ठरेल. गहू, हरभरा, हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी थंडीचा कालावधी अधिक राहणार असल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परंतु, थंडी अधिक वाढली तर ती नाशिकच्या द्राक्षांना मात्र संकट निर्माण करणारी ठरू शकते.
महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त गारठले
दरम्यान, राज्यातील नाशिक आणि औरंगाबाद ही शहरे महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठले असल्याचे तापमानातून समोर आले आहे. सोमवारी (दी.१) औरंगाबाद मध्ये १२.५ तर नाशिक १२.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वर १३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. याच सोबत राज्यातील इतर शहरातही तापमानात मोठी घट झाली आहे. ज्यात जळगाव १३.७, उस्मानाबाद १३.८, बारामती १४.१, सातारा १४.४, परभणी १४.४, उदगीर १४.५, नगर १४.८, जालना १५.३, नांदेड १५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.