नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील नामांकित एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये बुधवारी (दि.२८) रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. एकूण दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. दरम्यान, एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातच या विद्यार्थ्यांना उपचारसाठी भरती करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मोठे आणि नामांकित वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या ठिकाणी अश्या पद्धतीची घटना घडल्याने तसेच वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीच यात बाधित झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाविद्यालयात असलेल्या कॅन्टीनच्या चालकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
काही महिण्यापूर्वी इगतपुरी तालुक्यातच असलेल्या एका आश्रम शाळेत अश्या पद्धतीने जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पोषण आहारातून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्यातील अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली होती तर दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला होता. आता थेट नामांकित शिक्षण संस्थेच्या आणि तेही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.