नाशिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत काढलेल्या रॅलीमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नाशिककर भर उन्हात घामाघूम झाले.
त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ मार्गावर आधीच स्मार्ट सिटीचे कामकाज सुरू असल्याने एकेरी वाहतूक असताना त्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने वाहतूककोंडीत भर पडली. उमेदवारी अर्ज सोमवारी (ता.८) दाखल करणार असल्याचे विविध पक्षांनी उमेदवारांनी नाशिक शहर वाहतूक शाखेस पत्र दिले. त्यानुसार वाहतूक शाखेने आधीच नियोजन करणे अपेक्षित होते. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेने ५ पोलीस अधिकारी व ६० वाहतूक पोलीस तैनात केले होते. मात्र, प्रत्यक्षात वाहतूक शाखेचे नियोजन कोलमडले. उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने शहरातील खडकाळी सिग्नल, त्र्यंबकनाका, अशोकस्तंभ या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.