जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गाडी अडवली म्हणून मालेगाव तालुक्यातील शेतमजूर महिलांनी अचानक देवळा पाचकंदिल परिसरात विंचूर- प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे अर्धा तास मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली. नगरसेवक बाळासाहेब आहेर, बबन आहेर, सुनिल भामरे आदींनी मध्यस्थी करून महिलांची समजूत घातल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
सध्या तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात दुष्काळी झळा सोसाव्या लागत आहेत. दुष्काळामुळे हाताला काम मिळेनासे झाले आहे. उपजीविकेसाठी रोजगाराच्या शोधात हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष मजूर खासगी वाहनाने तालुक्यातील काही भागात व कळवण तालुक्यात नियमित येतात. कांदे काढणी व ते चाळीत साठवणूकीच्या कामासाठी मजुरांना मोठी मागणी आहे. इतर तालुक्यातून येणार्या या मजुरांचा शेतकर्यांना मोठा आधार आहे.
गुरूवारी (४ एप्रिल) जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अनधिकृत प्रवासी वाहतूक केली म्हणून जळगाव चोंडी येथील शेतमजुरांचे वाहन अडवले. दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या संतप्त महिला मजुरांनी इतर वाहनातून येणार्या मजुरांशी संपर्क साधला व सर्व पाच कंदील परिसरात जमून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. विंचूर- प्रकाशा महामार्गावर यामुळे वाहतुक कोंडी होऊन वाहनधारकांची व पोलिसांची धावपळ झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगरसेवक व नागरीकांनी पोलीस व मजूर महिलांमध्ये मध्यस्थी करून आंदोलनापासून परावृत्त केले. प्रसंगी अर्धा तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.