घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत जुन्या वादातून युवकाची हत्या; पाच जणांना अटक

पंचवटीत जुन्या वादातून युवकाची हत्या; पाच जणांना अटक

Subscribe

हिरावाडीतील हल्ल्यात जखमी झाल्यानंतर सुरू होते उपचार, दीड महिन्यांत चार खून

नाशिक : जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने दोन तरुणांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना हिरावाडीत घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. न्यायालयाने पाचजणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पंचवटी परिसरात गेल्या महिनाभरात ही तिसरी हत्येची घटना घडल्याने पंचवटी गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र पुढे येत आहे. हत्येच्या घटनांमुळे पोलिसांची गस्त परिसरात नावालाच उरली असून, परिसरात गुंडांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

व्यंकटेश उर्फ गिप्पी रामयज्ञ शर्मा असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तेजस उर्फ बाळा शाम मंडलिक असे जखमी तरुणाचे नाव आहे. हिरावाडीतील त्रिमूर्ती नगर परिसरातील बाप्पा सिताराम चौक येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास व्यंकटेश शर्मा, तेजस मंडलिक व त्यांचा एक मित्र असे तिघेजण थांबले. त्यावेळी चौकात दूध घेण्यासाठी आलेल्या रवी जोशी व श्याम जोशी यांच्याशी त्यांची नजरानजर झाली. 15 दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात असल्याने त्यांनी एकमेकांना खुन्नस दिली.

- Advertisement -

सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली. तितक्यात रवी जोशी याचा भाऊ सचिन शामकांत जोशी, श्रीकांत शंकर जोशी, कुणाल शामकांत जोशी धारदार शस्त्रांसह आले. सचिन जोशी याने चाकूने व्यंकटेश शर्मा व तेजस मंडलिक यांच्यावर वार केले. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले. व्यंकटेश शर्मा याचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -