लासलगाव – दिवाळीनिमित्त १० दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी (दि.९) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात झाली. यात कांद्याच्या दरांत ४०० रुपयाने वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, दर कायम राहावेत यासाठी सरकारने कांदा आयात करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतेय.
कांदा लिलाव पूर्ववत होऊन उन्हाळ कांद्याला कमाल ३ हजार २५१ रुपये दर मिळाला. लिलाव सुरू होताच बाजारभावात प्रतिक्विंटल चारशे रुपयांची वाढ झाली. कांद्याच्या आगारात कांदा लिलाव सुरू झाल्यानं बाजारपेठेत उत्साह दिसून आला. गेल्यावर्षी याच कालावधीत उन्हाळ कांद्याला किमान ८००, सरासरी ३ हजार ६३६, तर कमाल ६ हजार ३०० रुपये भाव मिळाला होता. याचवेळी लाल कांद्याला किमान ७००, सरासरी ३ हजार ४६८, तर कमाल ५ हजार १०१ रुपये भाव मिळाला. गेल्यावर्षाच्या तुलनेत कमाल दर निम्याहून कमी आहे.
किरकोळ कांदा दरात तेजी येताच भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकारने आयकर विभागामार्फत पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. त्यानंतर नाफेडमार्फत खरेदी केलेल्या २ लाख मेट्रिक टन कांद्यापैकी १ लाखाहून अधिक मेट्रिक टन कांदा शहरी भागांत पाठवून दर स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. बाहेरच्या देशांतूनही मोठ्या प्रमाणात कांदा आयात सुरू केलीय. मात्र, हा कांदा चवीच्या बाबतीत फिका असल्याने त्याचा कांदा दरांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी वर्तवलाय.