ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी सेविका यांची एकूण 1147 रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असल्याने येत्या काही दिवसांत या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. शासनाच्या नियमांनुसार 20 ते 30 वर्षे या वयाची मर्यादा असल्यामुळे अनेक महिलांचा हिरमोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात एकूण 4 हजार 776 अंगणवाड्या आणि 506 मिनी अंगणवाड्या आहेत. यात आदिवासी क्षेत्रात 2697 अंगणवाड्या आहेत. तर बिगर आदिवासी भागात 2587 अंगणवाड्या आहेत. येथे रिक्त असलेल्या जागांसाठी आता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्य शासनाने या भरतीस 17 जानेवारी 2020 रोजी मान्यता दिली होती. परंतु, कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असून, लवकरच भरती पूर्ण करण्यात येईल. त्याविषयीच्या सूचना प्रकल्प अधिकार्यांना देण्यात आलेल्या आहेत.
भरती प्रक्रियेला 20 ते 30 वयाची मर्यादा घातल्यामुळे अनेक गरजू महिला यापासून वंचित राहतात. त्याचा गांभीर्याचे विचार करुन ही वयोमर्यादा 40 पर्यंत वाढवण्याची मागणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे. त्यास अद्याप मान्यता न मिळाल्याने सध्याच्या वयोमर्यादेतच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यात विविध निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात येणार असून, त्याआधारे पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
17 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार अंगणवड्यांमधील रिक्त पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध सुरु असल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. निर्बंध शिथील होताच भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्याविषयी प्रकल्पअधिकार्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णयानुसार पारदर्शपकणे प्रक्रिया राबवण्यात येईल.
– दीपक चाटे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.