घरमहाराष्ट्रनाशिकअवकाळीला कंटाळून नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अवकाळीला कंटाळून नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Subscribe

कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्यावर सरकार नियंत्रण आणत असतानाच आता अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानामुळे बळीराजा आपली जीवनयात्रा संपवित असल्याच्या घटना पुढे येत आहे. गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात अशा दोन आत्महत्या झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. १) दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख या शेतकर्‍याने अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे व्यथित होऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तर ३० ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुक्यातील केदा देवरे या शेतकर्‍याने आत्महत्या केली होती.

ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने जोर धरला असून त्याचा फटका बळीराजाला बसत आहे. अनेक ठिकाणी फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. द्राक्षबागांवरही मोठे संकट आहे. कर्जबाजारी होऊन द्राक्षबागा जगवण्याचे काम शेतकरी करत असताना अचानक निसर्गाने ऐन दिवाळीत शेतकर्‍यांचे दिवाळे काढण्याचे काम सुरू केले आहे. अवकाळीच्या नुकसानामुळे व्यथित होऊन गुरुवारी (ता. ३०) मालेगाव तालुक्यातील केदा देवरे या शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख (वय ४८) या शेतकर्‍याने न्युऑन नावाचे औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा आज संपवली. देशमुख यांच्यावर कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असून इतरही काही बँकेचे कर्ज आहे का? याविषयी चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

देशमुख यांच्याकडे दीड एकर द्राक्ष बाग होती. अवकाळीचा फटका द्राक्ष बागेला बसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुरुवारी (३१ नोव्हेंबर) रात्री जेवण झाल्यावर बाहेरच्या पडवीत संजय देशमुख झोपी गेले. त्यांचे मुलेही घरात झोपले होते, सकाळी मुलगा नितीन उठल्यानंतर बाहेर येताच वडिलांच्या तोंडाला फेस असल्याचे त्याच्या लक्षात आले. शिवाय त्यांच्या शेजारी न्युऑन औषधाची बाटली पडली होती. त्यांनी संजय देशमुख यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही प्रतिसाद न आल्यामुळे आरडाओरडा करून त्यांनी शेजारील चुलते वगैरे त्यांना बोलून घेतले. त्यानंतर ही माहिती दिंडोरी पोलीस स्टेशनला कळवली असता दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

उपचारासाठी दाखल करत असताना देशमुख मृत असल्याचे समजले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले असून अतिशय शोकाकुल वातावरणात मोहाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातून शेतकरी आत्महत्या झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने त्वरित याविषयी गांभीर्याने काहीतरी दखल घेऊन पाऊल उचलावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण आव्हाड, एस.पी.जाधव, माळेकर, दिलीप पगार आदी दिंडोरी पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -