खासदार नवनीत राणा यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांनी नंतर माघार घेतली. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे तसेच सामाजित तेढ निर्माण केल्यामुळे खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना १४ दिवस कोठडीत राहावे लागले होते. परंतु आता पुन्हा राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी थेट दिल्लीतून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. अशी घोषणा रवी राणा आणि नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी मिळण्यासाठी प्रार्थना करणार असल्याचे रवी राणा म्हणाले आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांनी आपली विचारधारा सोडलेली आहे, अशा उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी मी दिल्लीत असणार आहे. १४ तारखेला सकाळीच आम्ही दिल्लीतील कॅनोट प्लेसला संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आम्ही आरती करणार आहोत. हे संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे, ते दूर झालं पाहिजे, अशी मागणी आम्ही महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करुन करणार आहोत असे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुबुद्धी मिळाली पाहिजे
महाराष्ट्रातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही दिल्लीतील हनुमानाचे जे प्राचीन मंदिर आहे. त्या ठिकाणी १४ मे शनिवारी आरती करणार आहे. हनुमान चालीसा पठण करणार आहे. कोण गदाधारी आहे. महाराष्ट्र संकटमुक्त झाले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही महाआरती करणार असल्याचे रवी राणा म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ जाहीर करावा
खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. बाळासाहेबांनी मृत्यूपर्यंत एकही निवडणूक लढली नाही. त्यांना पदाची लालसा नव्हती. तर तुम्हाला पदाची लालसा आहे. तुम्ही निवडणूक लढा आणि हे नक्की आहे की, मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याचे आव्हान नवनीत राणा यांनी दिले आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली, रवी राणांचा गंभीर आरोप