अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी जामीन मिळाला आहे. मात्र या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने केलेल्या गौप्यस्फोटाने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रभाकर साईलने समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला आहे. या संदर्भात एनसीबीकडून विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी सुरु आहे. या चौकशीसाठी एनसीबीने पाच अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आलं आहे. या पथकाने बुधवारी समीर वानखेडे यांची चार तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. दरम्यान पंच प्रभाकर साईल याच्याकडे या संदर्भात चौकशी करण्यासाठी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करून देखील साईल हा चौकशीला हजर राहिलेला नाही.
मागील तीन दिवसांपासून प्रभाकर साईलची मुंबई पोलिसांनी स्थापन केलेली एसआयटी चौकशी करत आहे. यामुळे एनसीबीने मुंबई पोलिसांना पत्र पाठवून प्रभाकर साईल याला चौकशीसाठी हजर करावे अशी विनंती केली आहे.
एनसीबीकडून वानखेडेंची ४ तास चौकशी
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानकडे २५ कोटी रुपये खंडणी मागितली असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी आणि समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून ५ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. या टीमकडून समीर वानखेडे यांची ४ तास चौकशी करण्यात आली आहे. पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांनी सोशल मीडियावर वानखेडेंवर आरोप केले आहेत.