सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलाच दणका दिला आहे. सांगलीच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बसवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे एक प्रसिद्ध वाक्य ते म्हणजे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच त्याचाच सांगलीच्या पालिका निवडणूकीत आला असल्याचे दिसते आहे. सांगलीच्या महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे महापौर म्हणून दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत. सांगली मनपावर भाजपची सत्ता होती. राष्ट्रवादीला सत्तापरिवर्तन करण्यामद्ये यश आले आहे.
सांगली मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडीमध्ये राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला आहे. भाजपची ६ मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले आहे. २ नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली होती.
चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली मात्र ती अखेर व्यर्थ ठरली असल्याचे समोर आले आहे.
मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे आहे.
भाजप – ४१
काँग्रेस – २०
राष्ट्रवादी – १५
अपक्ष – २
सांगली महापालिकेवर सत्ता टिकवण्यासाठी भाजप शेवटपर्यंत धडपड करत राहिले. नगरसेवक फोडाफडीची शक्यता असल्यामुळे सांगलीत महापौर कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. भाजपचे नगरसेवक संपर्कात नसल्यामुळे भाजपमध्ये कमालीचा तणाव दिसून येत होता. त्यामुळे भाजप आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु हे सारे प्रयत्न निष्फळ ठरले आहे.
हेही वाचा : कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या माजी खासदार महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा