मुंबईसह राज्यभरात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. गेल्या कित्येक दिवासांपासून मुंबईकर पावसाची वाट पाहत होते. अखेर शुक्रवारी सकाळपासून त्याने दमदार एन्ट्री मारत मुंबईची तुंबई करुन सोडली. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकलसेवा पावसाने खंडीत केली. याशिवाय रस्ते वाहतूक आणि विमान वाहतूकवर देखील या पावसाचा परिणाम झाला. दरम्यान, या पहिल्याच पावसाने राज्यभरात ९ जणांचा बळी घेतला. यात मुंबईतील तीन जणांचा समावेश आहे. विजेचा धक्का बसल्यामुळे या तिन्ही जणांचा मृत्यू झाला. यासोबतच पावसामुळे राज्यभरातील विविध भागांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला.
नांदेड आणि अकोल्यात दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे भिवंडीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अकोला आणि नांदेड येथे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर वाशिम येथे एका जणाचा मृत्यू झाला. पहिल्याच पावसात नऊ जणांचा बळी गेल्यामुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.