कोणत्याही राजकीय पक्षाकडे देशाचं उज्ज्वल भविष्य नाही. सर्वच पक्ष पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्यामागे लागलेत. कुणाचंही सरकार स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार मानत असेल तर जनसंसद शक्तिशाली करा. ज्यामुळे सरकार पडेल. कारण, देशाला वाचवण्याचा दुसरा पर्याय नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय पक्षांच्या कार्यप्रणालीवर टिकास्त्र सोडलं.
राळेगणसिद्धीत आयोजित राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. काँग्रेस असो की भाजप कोणत्याही पक्षाकडे देशाचं उज्ज्वल भविष्य नाही. देशात बदल घडवायचा असेल, तर सरकारवर जनसंसदेच्या माध्यमातून दबाव आणला पाहिजे. २०११ मध्ये लोकपाल आंदोलनात आम्ही हाच संकल्प घेऊन आमची टीम उतरली होती. मात्र, काही व्यक्तींच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या आणि टीम विखुरली गेली. कुणी मुख्यमंत्री झालं, कुणी राज्यपाल, तर काही मंत्री झाले. यातून देशाचं मोठं नुकसान झालं, असंही अण्णा हजारे यांनी सांगितलं.
अण्णा पुढे म्हणाले की, काही व्यक्ती माझ्यावर हेतूपुरस्सर टीका करतात. मात्र, मी त्याकडे लक्ष देत नाही. माझं काम समाज आणि देशहितासाठी आहे. माझा काही स्वार्थ नाही. मी ४६ वर्षांपासून मंदिरात राहतोय. माझ्याकडे खाण्यासाठी ताट आणि झोपण्यासाठी बिछाना एवढ्याच गोष्टी आहेत. मला कोणत्याही राजकीय पक्षाशी देणं-घेणं नाही. मी कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आंदोलन करत आलोय. दिल्लीत ९ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मी एक दिवसीय उपोषणदेखील केलं. यातून सरकार शेतकऱ्यांबाबत जराही गंभीर नसल्याचं दिसून आलं.
राळेगणसिद्धीत रविवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिरात १४ राज्यांचे ८६ कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिबिरात जनआंदोलनासाठी राष्ट्रीय संघटना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अण्णांसह दिल्लीतल जगदीश सोलंकी, राजस्थानातील रामपाल जाट व दशरथ भाई, उत्तराखंडचे भोपालसिंह चौधरी, मुंबईच्या कल्पना इनामदार, राजस्थानचे योगेंद्र पारिख, महाराष्ट्रातून अशोक सब्बन उपस्थित होते.