घरमहाराष्ट्रमला नाही तर तपासालाच क्वारंटाईन केले -विनय तिवारी

मला नाही तर तपासालाच क्वारंटाईन केले -विनय तिवारी

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारमधून मुंबईत आलेले पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे शुक्रवारी बिहारला परतले. मात्र बिहारला जाण्यापूर्वी विनय तिवारी यांनी, मला नाही तर तपासालाच क्वारंटाईन करण्यात आले होते, अशी जोरदार टीका केली आहे.

तपासासाठी मुंबईत आल्यावर एसपी विनय तिवारी यांना मुंबई पालिकेने क्वारंटाईन केले होते. अखेर त्यांची महापालिकेने शुक्रवारी क्वारंटाईनमधून सुटका केली. त्यानंतर बिहारमध्ये जाण्यापूर्वी विनय तिवारी मीडियाशी बोलत होते. ते म्हणाले की, मला नाही तर तपासाला क्वारंटाईन केले होते, असे मी म्हणेन. बिहार पोलीस तपास करत होते. मला क्वारंटाईन केल्यामुळे त्यात अडथळा निर्माण झाला. ज्या वेगाने तपास करण्यासाठी आम्ही आलो होतो तो करू शकलो नाही.

- Advertisement -

बिहारच्या पोलीस अधिक्षकांनाच मुंबईत क्वारंटाईन केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. यावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला यातून चांगला मेसेज जात नसल्याचे सांगून झापले होते. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे पोलीस तक्रार केल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यासाठी पथक दाखल झाले होते; पण मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने बिहार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता.

क्वारंटाईन केल्यानंतर पालिका आयुक्तांना बिहार पोलीस अधिकार्‍यांनी पत्र लिहून विनय तिवारी यांची सुटका करण्यासाठी विनंती केली होती. तसेच याबाबत कायदेशीर मार्गाने पुढचे पाऊल उचलू असे देखील त्यांनी म्हटले होते. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य करत सीबीआयकडे तपास देण्यास मान्यता दिली. यानंतर सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -