सोशल मीडियावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. सध्या या प्रकरणाने राजकीय वळण घेतले असून याप्रकरणी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर विरोधी पक्षाकडून आरोप करण्यात येत आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले असून ही आत्महत्या नाहीतर हत्या असल्याचे बोले जात आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेले काही दिवस काही महिने लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी अनेक प्रकरण देखील समोर आली आहेत. मात्र, याप्रकरणात तसे काही होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे’, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवडी येथे ट्रानहार्बर येथे कामाची पहाणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाईल’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.
शिवडी नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंकचे काम
शिवडी नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंकचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे हे काम मंदावले होते. अन्यथा डिसेंबर २०२२ मध्ये ट्रान्स हार्बर लिंकचे काम पूर्ण झाले असते. पण, कोरोनामुळे हे काम रखडले. परंतु, २०२३ मध्ये हा प्रकल्प आता पूर्ण होईल. तसेच शिवडी, वरळी, कोस्टल रोड असे महत्वाचे प्रकल्प लवकरच पूर्ण केले जातील. याशिवाय समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे येत्या १ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी पर्यंतचा रस्ताही खुला केला जाणार आहे.
हेही वाचा – शरद पवार साहेब तुम्हीच धनगर समाजाला न्याय देऊ शकता – महादेव जानकर