भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मी सोलापुरातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांची आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. बहुजन वंचित आघाडीच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी ही माहिती दिली. परंतु निवडणूक कुठून लढवणार यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढल्यास काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. भाजपाचे शरद बनसोडे हे सोलापुरातून विद्यमान खासदार आहेत. बनसोडे यांनी मोदी लाटेत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
आघाडीकडे २२ जागांची मागणी
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आघाडीसंदर्भात बैठका सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आघाडीकडे २२ जागांची मागणी केली आहे. परंतु काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना तेवढ्या जागा देण्यास तयार नाही. बहुजन वंचित आघाडीला २२ जागा द्यायच्या, राजू शेट्टी यांना दोन जागा द्यायच्या, अन्य मित्रपक्षांना एक-दोन जागा दिल्यावर शिल्लक राहणाऱ्या दहा-बारा जागा आम्ही वाटून घ्यायच्या का, असा सवाल बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. बहुजन वंचित आघाडी २२ जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागा मागत आहे.
उद्या होणार निर्णय
असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमसोबत आघाडी करून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीसोबतच भाजप-शिवसेनेच्या युतीसमोर देखील आव्हान उभं केलं आहे. आता आंबेडकरी जनता त्यांच्या पाठिशी किती प्रमाणात उभी राहाते आणि वर्षानुवर्षे काँग्रेसच्या पाठिशी जाणारी मुस्लीम व्होटबँक आता एमआयएमकडे वळणार का? हे प्रश्न निकालांनंतरच सुटतील. शिवाय प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला यापैकी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचाही निर्णय उद्या, मंगळवारी जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.