नवी दिल्लीः Meeting on LoudSpeaker Issue in Maharashtra : गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवर भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर काही मशिदींवर लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाल्याचंही पाहायला मिळालं. आता ठाकरे सरकारने लाऊडस्पीकरचा आवाज निश्चित करण्यासाठी नवी नियमावली बनवण्याचा निर्णय घेतला असला तरी हा वाद अद्याप संपलेला दिसत नाही.
या वादामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दीर्घकाळ चाललेला संघर्षही पुन्हा एकदा समोर येत आहे. खरे तर आज महाविकास आघाडी सरकारने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
कोण कोण सहभागी होणार?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीला भारतीय जनता पक्षाकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे या बैठकीला सहभागी होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय अन्य काही लहान पक्षांचे नेतेही तेथे उपस्थित राहणार आहेत.
बैठक का बोलवावी लागली?
खरे तर महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दा राज ठाकरेंनी याच महिन्यात उपस्थित केला होता. त्यांनी 14 दिवसांपूर्वी आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात उद्धव सरकारला राज्यातील सर्व मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवावेत, असे सांगितले होते. राज्य सरकार हे काम करणार नसेल, तर ते स्वतः लाऊडस्पीकर काढून मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. तब्बल 10 दिवसांनंतर राज ठाकरे पुन्हा या विषयावर बोलले आणि त्यांनी देशातील हिंदूंना एकत्र येण्यास सांगितले होते. ३ मेपर्यंत सर्व मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत, तर ते स्वत: हटवायला सुरुवात करू, असे ते म्हणाले होते. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, पण कोणी कायदा मोडत असल्यास ते मान्य नसल्याचंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलं होतं.