कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोरोना त्रिसुत्रीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टिन्सिंग पाळणे आणि हात धुणे हे सध्याच्या काळात सातत्याने करणे महत्त्वाचे आहे. पण काहीजण या कोरोना नियमांना पायदळी तुटवताना दिसत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. याच दरम्यान सध्या राज ठाकरे यांना मास्कचे वावडे असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी राज ठाकरे सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच राजकीय वर्तुळात राज ठाकरे मास्क न लावण्याच्या भूमिकेबद्दल बोलले जात आहे. सर्वसामान्य जनतेवर मास्क घातला नाही तर कारवाई होत आहे. मग राज ठाकरेंवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तसेच या लॉकडाऊनमध्ये कठोर निर्बंध देखील लावण्यात आले. पण हा राज्य सरकारचा निर्णय मनसेला रुचला नाही. त्यामुळे मुंबईतील लोकल आणि दारुच्या दुकानांवरील निर्बंध हटवले जावेत यासाठी मनसेने आवाज उठवला होता. पण सरकारने काही मनसेकडे लक्ष दिले नाही. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोनाचे त्रिसुत्र पाळण्यासाठी सातत्याने सरकारकडून आवाहन केले जात आहे. पण अशातच मनसेचे अध्यक्ष स्वतः मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.
याबाबत आठवल्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना असा तर्क लावला की, ‘राज्यात मास्क न घालणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे नेत्यांवरही झाली पाहिजे. सर्वांनीच राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे आणि राज ठाकरेंनी देखील पाळले पाहिजेत. पण बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश असल्यामुळे राज ठाकरेंना पाळायचे नसतील. म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील.’
हेही वाचा – राज ठाकरेंना मास्कचे वावडे, नाशकातही विनामास्क एन्ट्री