खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी रायगडावरून केलेल्या घोषणेनंतर आज सायंकाळी पुन्हा सकल मराठा समाजाच्या समन्वयकांशी बैठक घेतली. या बैठकीनंतर आजोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी उदयनराजेंना भेटणार असल्याचे जाहीर केले. तसेच मराठ्यांच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही ताकदपणाला लावली पाहिजे अशी मागणी संभाजी राजेंनी केली आहे.
यावेळी बोलताना संभाजी राजे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेला जनतेला कोण वेठीस धरतेयं हा प्रश्न साऱ्या पुढाऱ्यांनाच विचारा. छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला आहे मी आजपर्यंत कोणालाच वेठीस धरले नाही हा माझा रेकॉर्ड आहे. विषय साधा आणि सरळ आहे की, कोणाच्या विरोधात आमचा लढा नाही. आमचा लढा मराठ्यांच्या प्रश्नांना, समाजाला न्याय मिळवून द्या. न्यायमूर्ती भोसले यांनी अहवाल देण्याआधीच आम्ही आमच्या मागण्या मांडल्या होत्या. मराठा समाजांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी फक्त महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही एकत्र येत महाराष्ट्राची तिथे ताकद लावयला पाहिजे. ”असेही त्यांनी सांगितले.
‘उदयराजेंची भेट घेणार’
“मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी सुद्धा उदयनराजेंना भेटेन, दोन राजे एकच आहेत त्यांत काही वेगळेपण नाही आणि दोघेही देखणे आहेत. पक्ष आणि संघटनेचा हा विषयचं नाही. कोणत्याही पक्षाला आमचा विरोध नाही. आमची अराजकीय हा मोर्चा आहे. यातून मराठा समाजाला न्याय मिळवून द्या अशीच एकमेव मागणी आहे. त्यामुळे न्यामूर्ती भोसले अहवालानुसार आरक्षण द्या. कारण या अहवालाला सुप्रीम कोर्टानेही मान्यता दिली होती, त्यामुळे भोसले अहवाल योग्य आहे. महाविकास आघाडी सरकारने मार्ग काढावा कारण आमचीही इच्छा नाही आंदोलन करण्याची आणि समाजास वेठीस धरण्याची. सगळे थकले आहेत.” असेही संभाजी राजे म्हणाले.
‘अरविंद सावंत फार हुशार माजी केंद्रीय मंत्री आहेत’
“दुसरा मुद्दा अरविंद सावंत म्हणतात कोणाला वेठीस धरायचे आहे, अरविंद सावंत यांचे नाव मला घ्यायचे नाही कारण ते फार हुशार आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. असाही टोला संभाजी राजे यांनी लगावला. तसेच मी मराठा समाजाच्यावतीने मागितलेल्या पाच मागण्या मान्य करण्यासाठी सुप्रीम कोर्ट लागत नाही. आरक्षणासाठी फेरविचार याचिका दाखल करा. तसेच पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवा.” अशीही मागणी संभाजी राजेंनी केली आहे.
विनायक मेटेंबद्दल मला सारखे का विचारता ?
“विनायक मेटेंबद्दल मला सारखे का विचारता ? का माझी आणि त्यांची तुम्ही तुलना करता? जो समाजासाठी लढतो त्याचे कौतुक आहे. आणि त्यांचा तो अधिकार आहे. करु द्या ना.” असेही संभाजी राजेंनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना मेसेज केला आहे
आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून खासदार राहुल शेवाळे हे संपर्कात होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून फोन आला होता. अजित पवार भेटू इच्छित असल्याचं कळवण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सअॅपवरून मागण्या सांगितल्या आहेत. त्यामुळे पुन्हा काय चर्चा करायच्या? म्हणून अजितदादांना भेटलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे आंदोलन होणार
संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थित पार पडलेल्या सकल मराठा समाजा्च्या बैठकीनंतर आज सकल मराठा समाजाचे रायगड जिल्ह्याचे समन्वयक विनोद साबळे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. यावर बोलताना साबळे म्हणाले की, १६ जून रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाला एक मताने सर्व मराठा समन्वयकांनी पाठिंबा दिला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. १६ जूनपासून कोल्हापूरातील शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरून होणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हातील मराठा समन्वयक जाणार असून संभाजी राजेंच्या नेतृत्त्वाने सुरु असलेला हा लढा मराठा समाजाला न्याय मिळून देईपर्यंत सुरु राहणार आहे, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होईल, परंतु तरी जर सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास, सध्या आरक्षणाचा मुद्दा कोर्टात आहे तो मुद्दा तर आहेच. पण २८ मेला संभाजी राजेंनी मुख्यमंत्र्यांना भेटून ज्या पाच मागण्या केल्या होत्या. त्य़ा मान्य कराव्या अशी आमचीही राज्य सरकारकडे मागणी आहे.