शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत दाखल आहेत. संजय राऊत यांनी शरद पवार यांची शनिवारी भेट घेतली होती. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शनिवारी सकाळी भेट झाली असून तासभर चर्चा दोघांमध्ये झाली होती. या भेटीमध्ये शरद पवार यांनी सहकार क्षेत्र आणि बँकेच्या विषयांवर मोदींसोबत पवारांनी चर्चा केली. यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांनी या भेटीबाबत सांगितले की, शरद पवार यांनी सहकारी बँक नियमांसंदर्भात काही त्रुटी असल्यामुळे मोदींची भेट घेऊन चर्चा केली असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे मीडियाने राजकारणाच्या दृष्टीने पाहू नये असे संजय राऊत यांनी म्हटल आहे. पवार-मोदी भेटीमुळे राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी अशी नवी आघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असा प्रश्न संजय राऊत यांना करण्यात आला. यावर राऊत यांनी म्हटलंय की, या सगळ्या बातम्या बकवास आहेत. कोणाला अशा प्रकराची स्वप्न पडत असेल तर हा एक राजकारणाचा आजार आहे. ज्यांना ही स्वप्ने पडत आहेत त्यांनी तात्काळ उपचार करावा. ठाकरे सरकार हे पाच वर्ष टीकणार असून या आघाडीला तडा जाईल असे आघाडीतील खासदारांकडून काही होणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय बैठक घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील ज्वलंत विषयावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. देशात दुसरी लाट भयानक होती यानंतर आता तिसरी लाट आली आहे. याबाबत चर्चा केली पाहिजे. देशातील लोकांसाठी अन्न, वस्त्र निवारा आणि पेट्रोल डीझलच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली पाहिजे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चीनची घुसखोरी झाली आहे. चीनने पुन्हा एकदा लडाख सारख्या भागात घुसखोरी केली असून हा विषय खूप संवेदनशील आहे यामुळे केंद्र सरकारने या विषयावर देखील चर्चा केली पाहिजे. शिवसेनेचे खासदार लोकसभेत आणि राज्यसभेत संधी मिळाली तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर बोलणार आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करु असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.