नाशिक : महिनाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा प्रकोप झालेला आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. या कोसळधार पावसामुळे शेतकर्यांच्या पिके आणि घरांची तसेच गाव रस्ते, पशुधन आणि पाझर तलावांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला आहे. शेतकर्यांना तातडीने आणि भरघोस नुकसान भरपाई देण्यासाठी लवकरात लवकर नुकसानींचे पंचनामे करून सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्याच्या सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकार्यांना केल्या आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून सतत कोसळण्याचा अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटांना तोंड देत आहेत. अशातच गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाचा प्रकोप झाला असून अनेक ठिकाणी तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. या कोसळधार पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे आणि घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कधी नव्हे इतके नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आता कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार गोडसे यांनी जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांची भेट घेतली. काही दिवसांपासून सतत कोसळणार्या पावसामुळे शेतकर्यांचे नेमके किती आणि कसे नुकसान झाले आहे.यामुळे भविष्यात शेतकरी कसा अडचणीमध्ये येणार आहे याविषयीच्या सविस्तर व्यथा गोडसे यांनी जिल्हाधिकार्यांकडे मांडल्या. त्यामुळे यंदा शेतकर्यांना तातडीने आणि भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर नुकसानींचे पंचनामे करून सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्याच्या सूचना आज खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकार्यांना केल्या आहेत.