शरद पवार यांनी चुकीच्या नेत्याला पुढे आणून आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. शरद पवार यांनी चुकीच्या नेत्याला पुढे आणून आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली आहे.
त्यामुळे चळवळ मागे पडली आणि ‘तो’ नेताही पवारांच्या आता जवळ नाही, असा टोला आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता लगावला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने समाजवादी पार्टी आणि बसपा बरोबर आघाडी न करता सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले. याचा फायदा हा भाजपाला होणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते जर वंचित आघाडीला भाजपची ‘बी’ टीम म्हणत असतील तर काँग्रेस भाजपाची ‘ए’ टीम आहे अशी टीका त्यांनी केली आहे. यंदाची निवडणूक ही घराणेशाही आणि धार्मिकतेविरुद्ध आहे असेही ते म्हणाले. तसेच सोलापुरात पवारांची सभा ही केविलवाणी झाली. ज्या सेनापतींनी रिंगणातून पळ काढला त्याबद्दल काय बोलणार ? असा सवाल आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित करून पवारांवर सडकून टीका केली.