नाशिक : दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोसळणार्या अवकाळी पावसामुळे शेतमालासह पशुपालकांनाही मोठा तडाखा बसलाय. वातावरणात अचानक प्रचंड गारवा निर्माण झाल्याने देवळा तालुक्यातील दहिवड येथील लहान मोठ्या तब्बल १६ जनावरांचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर नगर,इगतपुरी या भागांमध्येही पावसामुळे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
काढणीला आलेला लाल कांद्यासह द्राक्ष, डाळिंब, पालेभाज्या आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या रोपावर बुरशी आणि करपा रोगांचा प्रार्दुभाव वाढला असून वातावरण अशाच पध्दतीने राहिले तर कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दहिवड येथील शिंदेवाडी (भवरी मळा) येथील मेंढपाळ कौतिक प्रभाकर शिंदे यांच्या ४ मेंढ्या, २ कोकरु, १बकरी, २ बकरीचे पिल्ले, १ गायीचे वासरू अशा १० तर सिंधोओहळ मळा येथील दादाजी अर्जुन देवरे यांच्या ६ मेंढ्या अश्या एकूण २० जनावरांचा गारव्यामुळे मृत्यू झाला. या घटनांचा प्रशासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.