गरमीमुळे हैराण झालेले मुंबईकर गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान नुकतेच मुंबईसह उपनगरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे. फक्त मुंबईतच नाही तर आज राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांसाठी लगबग सुरू केली आहे.
मुंबईसह राज्यातील या भागात पावसाचे आगमन
सकाळपासून मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कर्जत, महाबळेश्वर , लातूर या भागांमध्ये पावसाचे हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाची सैम्य रिमझिम सुरू आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवाश्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रत्नागिरी, महाबळेश्वर भागात पावसाची जोरदार हजेरी
सकाळपासूनच रत्नागिरी, महाबळेश्वर भागात पावसाचा कल वाढलेला असून या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला वेग पकडलेला आहे.
लातूर, सोलापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
लातूर, सोलापूर जिल्ह्यांतमध्ये मुसळधार पाऊस झाला
असून पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, काल रात्रीपासून मुंबई शहरासह राज्यातील काही भागांमध्ये सैम्य स्वरूपाचा पाऊस झाला. तर लातूर, बीड, सोलापूर भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे.