आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी हल्लाबोल केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधाकांसह सत्ताधारी पक्षाकडून एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातोय. अशाच या आंदोलनासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्य़ा शेकडो एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी हूसकावून लावले, दरम्यान आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी आता सीएसएमटी स्थानक गाठत आंदोलनास सुरुवात केली आहे. मात्र या आंदोलनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलीस यंत्रणेला जबाबदार धरले आहे. ही घटना म्हणजे पोलीस यंत्रणांचे अपयश असल्याचे म्हणत त्यांनी थेट पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे.
“पोलिसांची खरी चौकशी झाली पाहिजे”
कालच्या हल्ल्याला माझा निषेधचं आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे हल्ले होणे योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील मुद्दे योग्य कोरमवर मांडले जावे आणि त्याला सरकारने उत्तरही द्यावे. मात्र महत्वाचा प्रश्न निर्माण होते की, संपूर्ण मीडियाला माहित होतं की, अशाप्रकारे लोकं आंदोलनासाठी जात आहेत. मीडियातील लोकांना प्रतिक्रिया घेण्यासाठी आले तेव्हा मला सांगितले की, त्यांना अडीच वाजताच एसटी कर्मचारी आंदोलन करणार असे मेसेज आले होते. तर मग पोलिस काय करत होते? शरद पवार यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोकं प्लॅनिंग करून जातायत आणि पोलिसांना कल्पना नाही, हे पोलिसांचे अपयश आहे. त्यामुळे पोलिसांची खरी चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
“कॅमेरा मॅन पोहचू शकतात पण पोलीस त्याठिकाणी उशीरा पोहचतात”
पोलिसांचं एवढं मोठं अपयश कसं असू शकतं? कॅमेरा मॅन पोहचू शकतात पण पोलीस त्याठिकाणी उशीरा पोहचतात. ते दृश्य अतिशय भयावह होतं. अस देखील फडणवीस म्हणाले.