काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याला असहमत दर्शवलं आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे. सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकारण करायचं, असा टोला सुषमा अंधारे यांनी भाजपला लगावला आहे.
सुषमा अंधारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, द्वेषमूलक राजकारण पसरवले जात आहे. या द्वेषमूलक राजकारणामध्ये जाती आणि धर्म ऐकमेकांना हरवण्याच्या नादात माणूसकी हरली आहे. हाच महत्त्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असं अंधारे म्हणाल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव सोयीनुसार वापरायचे आणि राजकारण करायचं हा भाजपचा खेळ आहे. यामध्ये अनेक मुद्दे आहेत. हे कुठेच दिसत नाहीत. लोकांच्या जगण्या-मरणासंबंधीचे प्रश्न असतात, तेव्हा हे येत नाहीत, जेव्हा त्यांना वाटतं की, अपयश घडतंय तेव्हा ते वादंग करण्यासाठी झटकन पुढे येतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.