ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. परंतु हा सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या कार्यक्रमात जवळपास १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दरम्यान, याचे पडसाद संपूर्ण राजकीय वर्तुळात उमटले आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मतांचं राजकारण करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. लाखो लोकांसमोर आपण असलो पाहिजे, असा अट्टहास त्यांनी धरला होता. मात्र, त्यानंतर मृतकांच्या घरी किंवा रुग्णालयात त्यांनी जावं, त्यांची विचारपूस करावी, एवढी मानवतादेखील त्यांनी दाखवली नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
राजकारणांचं अध्यात्मिकरण झालं पाहिजे, ते अध्यात्माच्या पातळीवर गेलं पाहीजे. या लोकांनी आप्पासाहेबांकडून ते शिकलं पाहीजे. मात्र, राजकारणाचं अध्यात्मिकरण करण्यापेक्षा अध्यात्माचं राजकारण कसं करता येईल, यासाठी शिंदे सरकारचा प्रयत्न सुरू आहेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
महाराष्ट्र भूषण दुर्घटनेत आज आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील बळींचा आकडा १४वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत १० महिला तर ४ पुरुष असे एकूण १४ श्रीसदस्य मृत्यूमुखी पडले आहेत. तर ८ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच ३५ श्रीसदस्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत.
मृत १४ श्रीसदस्यांची नावे पुढीलप्रमाणे –
- तुळशिराम भाऊ वागड
- जयश्री जगन्नाथ पाटील
- महेश नारायण गायकर
- कलावती सिध्दराम वायचाळ
- मंजूषा कृष्णा भोंबडे
- भीमा कृष्णा साळवी
- सविता संजय पवार
- स्वप्नील सदाशिव केणी
- पुष्पा मदन गायकर
- वंदना जगन्नाथ पाटील
- मिनाक्षी मोहन मेस्त्री
- गुलाब बबन पाटील
- विनायक हळदणकर
- स्वाती राहुल वैद्य