कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र ऑनलाईन वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना किती आत्मसात केले, जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम हाती घेतला आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला मराठी आणि गणित विषयाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून चाचण्या होणार आहेत. त्यानंतर उर्दू माध्यमाच्या चाचण्यांना सुरु होणार आहेत.
ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क आणि संवादाचे माध्यम असलेल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम राबवण्यात येणार आहे. एससीईआरटी आणि पुणे व लिडरशीप फॉर इक्विटी आणि कॉन्व्हेजिनियस यांच्या माध्यमातून हे स्वाध्याय तयार करण्यात आले आहे. दर शनिवारी स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना गणितातील १० आणि भाषेतील १० प्रश्न सरावासाठी पाठवण्यात येणार आहे. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असणार आहेत. दर शनिवारी स्वाध्याय उपक्रम राबवण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांकडून सर्व प्रश्नांची उत्तरे देताच लगेचच त्यांच्या कामगिरीचा अहवाल विद्यार्थ्याला मिळणार आहे. जेणेकरून त्यांना स्वत:च्या कामगिरीचे मूल्यमापन करणे शक्य हाईल आणि ते सक्षम होऊ शकतील अशी यामागची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा अहवालही शिक्षकांना देण्यात येणार असल्याने शिक्षक अधिक चांगल्याप्रकारे उपाययोजना करू शकतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पायाभूत आणि संख्याज्ञान यावर भर असून, त्यासाठी स्वाध्याय हा उपक्रम मदतगार ठरणार आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
- स्वाध्याय या उपक्रमांतर्गत एका स्मार्ट फोनद्वारे १०० विद्यार्थी व्यस्त राहू शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थी, पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत ते देखील या उपक्रमात सामील होऊ शकतात.
- शिक्षक, स्वयंसेवक, एसएमसी सदस्य, गावातील किंवा वस्तीपातळीवरील स्थानिक तरुण हे यासाठी मदत करू शकतात.
- संकलित केलेली माहिती डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. माहितीबाबत कोणत्याही गैरप्रकारांबद्दल कठोर कारवाई आणि दंड आकारला जाणार आहे.