अवकाळी पावसानंतर आता राज्यात हळूहळू थंडीला सुरुवात होत आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर आज धुक्यात हरवून गेले होते. तर नागपूर आणि नाशिकमध्ये पारा घसरल्याचे चित्र होते. नागपूरमध्ये यंदा मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये पारा ५.१ अंशांपर्यंत घसरला आहे. तर नाशिकमध्ये पारा ११ अंशांपर्यंत घसरला आहे.
देशभरात थंडीची चाहूल
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच उत्तर भारतात देखील गोठवणारी थंडी पडू लागली आहे. आता राज्यातही काही भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज नागपूरमध्ये पारा ५ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद करण्यात आली. तर नाशिकमध्येसुद्धा कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये पारा ११ अंशांवर पोहोचला आहे. तर निफाडमध्ये १५ अंशांवर पोहोचला होता. खान्देशातील धुळ्यात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यानुसार धुळ्यात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही कमी तापमानाची नोंद झाली.
पुणे, मुंबईला थंडीची प्रतिक्षा
गेले दोन दिवस पारा घसरल्याने शहरी भागातील जनजीवनावर थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे. तर यंदा रब्बी पिकांना थंडीचा फायदा होऊ शकतो. दरम्यान उत्तर महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली असली तरी पुणे, मुंबईकरांना अजून काही दिवस थंडीची वाट पहावी लागणार आहे.