मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाऊन शिंदे गट, भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर तुफान फटकेबाजी केली. याविरोधात आता प्रतिक्रिया येऊ लागल्या असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रहार केला आङे. त्यांच्या नाकाखालून ४० आमदार निघून गेल्याने त्यांची निराशा झाली आहे, तेच सभेत दिसलं, असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
तेच शब्द, तीच वाक्य, तेच टोमणे या व्यतिरिक्त काहीही नवीन यांच्याकडे नाही, खरं म्हणजे त्यांच्या नाकाखालून 40 लोक निघून गेल्याचा संताप आणि निराशा तसेच त्यांच्या भाषणात हताशपणाही दिसून येत होता. त्यामुळे अशा हताश भाषणावर आणि टोमण्यांवर काहीही प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी सरकारच्या हर घर जल, हर घर नल या योजनेचा केक कापण्यात आला. राजकीय मैदानात तुफान बॅटींग करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमात कपिल पाटील यांच्यासोबत क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी केली.
लोकोपयोगी काम करणारा नेता म्हणून कपिल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. आर. आर. पाटील जे कपिल पाटील यांच्या विषयी बोलले तेच आम्ही हेरलं आणि कपिल पाटील यांना त्यांच्याकडून चोरलं होतं, अशा शब्दांत फडणवीसांनी कपिल पाटलांचं कौतुक केलं.
On the occasion of Union Minister @KapilPatil_ ji’s birthday today, attended sports program Khasdar Mahotsav, Panchayat Raj Tournament at Dive Anjur, Bhiwandi, this evening.
Me & Kapil ji enjoyed playing cricket too.
MLA @niranjandtweets, sportspersons, well wishers were present. pic.twitter.com/fm4ZJDy68k— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 5, 2023
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
बाळासाहेबांनी भाजपला मोठे केले. आज ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. हिमत असेल तर मोदींच्या नावाने मते मागवून दाखवा. बाळासाहेबांचे नाव न घेता मते मागवून दाखवा. निवडणूक लढवण्याची तुमच्यात हिमत नाही. अंधेरी पोटनिवडणूक लढवण्याची ताकद तुमच्यात नाही. कसब्यातही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे माझे खुले आव्हान आहे की निवडणुका घ्या. मी मशाल घेऊन येतो. बघू कोणाचा विजय होतो, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
गुजरातमधून सरदार पटेल चोरले, बंगालमध्ये सुभाषबाबू चोरले इकडे बाळासाहेब चोरले. चोराला, या वृत्तीला मत देणार का? तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. जनता जे ठरवेल ते मला मान्य. मी हवा की नको हे तुम्ही ठरवणार आहात. निवडणूक आयोग नाही. २०२४ स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही. संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे, असेही उद्धव ठाकरे यांना सांगितले.