घरमहाराष्ट्रविरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही - नाना...

विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही – नाना पटोले

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पुन्हा एकदा निवडणूक रणनीतीकार प्रशात किशोर यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर उद्या शरद पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये काँग्रेसचा नेता असणार नाही. त्यामुळे काँग्रेस विरहित तिसरी आघाडी तयार करण्याच्या विचारात शरद पवार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही, असं नाना पटोले म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा शरद पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेस विरहित आघाडी?

उद्या संध्याकाळी ४ वाजता विरोधकांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचाच्या झेंड्याखाली ही बैठक होणार आहे. आरजेडीचे मनोज सिन्हा, आपचे संजय सिंह यासारखे काही विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तथापि, काँग्रेसचा कुणी यामध्ये असणार की नाही याबद्दल अजून स्पष्टता नाही. जर यामध्ये काँग्रेस नसेल तर याचा अर्थ देशात नव्या आघाडीची चाचपणी सुरु आहे का? असा निघू शकतो. युपीएचं अध्यक्षपद शरद पवारांकडे असावं अशी चर्चा होती. युपीएच्या अध्यक्षपदाची चर्चा काँग्रेसला वगळून करता येणार नाही. जर शरद पवार यांच्या बैठका काँग्रेस सोडून विरोधकांसोबत होत असतील तर याचा अर्थ युपीएला पर्याय म्हणून तीसरी आघाडी देशात उभी राहतेय का? युपीए केवळ काँग्रेसकडे सोपवून तीसरी आघाडी करण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचं त्यांच्या बैठकांमधून दिसत आहे.

बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजपा राज्यात वाढला त्याच शिवसेनेला त्रास – नाना पटोले

भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास देत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे, हा भाजपचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पहावत नसून त्यांची खूर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी आटापीटा करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई करत आहेत. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -