उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि काँग्रेसचे राजेश राठोड या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील आणि डॉ. अजित गोपछडे या चार भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. खबरदारी म्हणून भाजपचे संदीप लेले, रमेश कराड, राष्ट्रवादीचे किरण पावसकर, शिवाजीराव गर्जे यांनी डमी म्हणून तर राठोड शेहबाज अलाउद्दीन या अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जांची छाननी आज करण्यात आली त्यामध्ये अपक्ष उमेदवार राठोड शेहबाज अलाउद्दीन यांचा अर्ज बाद झाला.तर भाजपचे संदीप लेले आणि डॉ. अजित गोपछडे आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे किरण पावसकर, शिवाजीराव गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
या निवडणुकीसाठी ९ जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. याची घोषणा लवकरच करण्यात येणार असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस ) काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील आणि रमेश कराड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.