भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते.त्यासाठी ते रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेत उत्तीर्ण होतात.त्यांची निवड रेल्वेमध्ये करण्यात येते. मात्र रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रुजू करून घेण्यात आले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१८ च्या असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी उत्तीर्ण झालेल्या ५६५ उमेदवारांना आतापर्यंत रुजू करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या उमेदवारांनी मध्य रेल्वेच्या विरोधात मंगळवारी मुख्यालयासमोर आंदोलन केले.
मध्य रेल्वे मुख्यालयासमोर आंदोलन
मुंबईच्या रेल्वे भरती बोर्डाकडून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे या तीन विभागांसाठी १ हजार ८६६ असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती केली जाणार होती. त्यानुसार लाखो उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. ज्यात तीन परीक्षांनंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेडिकल आणि नंतर कागदपत्र पडताळणी करण्यात आली. नंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. पश्चिम आणि दक्षिण मध्य रेल्वेत अर्ज करणार्या उमेदवारांना रुजू करण्यात आले. मात्र मध्य रेल्वेच्या ९७३ असिस्टंट लोको पायलटच्या पदांपैकी ४०८ उमेदवारांना रुजू करण्यात आले आहे. उर्वरित ५६५ उमेदवारांना रेल्वेकडून रुजू करण्यात आले नाही. यातील काही उमेदवारांना रूजू होण्याचे पत्रसुध्दा रेल्वेकडून देण्यात आले होते. मात्र रुजू होण्याच्या आदल्या दिवशी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे ५६५ उमेदवार संभ्रमात पडले आहेत. निवड होऊनही कामावर रुजू करून घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ मध्य रेल्वेच्या विरोधात मंगळवारी मध्य रेल्वेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
रेल्वेने दिले कोरोनाचे कारण
असिस्टंट लोको पायलट उमेदवारांना रुजू झाल्यानंतर तब्बल १०९ दिवसांचे टे्रनिंग घ्यावे लागते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मध्य रेल्वेचे ट्रेनिंग सेंट्रर आहे. मात्र मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आले होते. तसेच कोरोनामुळे या ट्रेनिंग सेंटरमध्ये सर्व उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलविणे शक्य नव्हते. त्यामुळे आतापर्यंत फक्त ४०८ उमेदवारांना ट्रेनिंग देण्यात आले. आता उर्वरित उमेदवारांचे ट्रेनिंग आणि रुजू होण्याचे पत्र जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.
तेलही गेले तूपही गेले
लाको पायलटच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधील राकेश यांनी आपलं महानगरला सांगितले की, जेव्हा माझी निवड असिस्टंट लोको पायलट म्हणून झाली. त्याचवेळी मी महाराष्ट्र राज्याचा विद्युत विभागात नोकरी करत होतो. मात्र अस्टिस्टंट लोको पायलट म्हणून निवड झाल्याने विद्युत महामंडळाच्या नोकरीचा राजीनामा दिला. आज राजीनामा देऊन एक वर्षांच्या जास्त कालावधी होत आहे. मात्र आतापर्यंत मला रेल्वेने रुजू करुन घेतले नाही. त्यामुळे या एका वर्षात माझ्यावर आर्थिक संकट आले आहे. माझ्यासारख्या अनेक मुलांनी इतर विभागातील नोकरी सोडली आहे. त्यामुळे रेल्वेने लवकरात लवकर आम्हाला अस्टिस्टंट लोको पायलट पदावर रुजू करु घ्यावे.